संकल्प माईंडफुलनेसचा

डॉ यश वेलणकर आपण जे काही वागतो आहे त्यामध्ये काही बदल आवश्यक आहे आणि तो शक्य आहे असे वाटते म्हणून संकल्प केला जातो.काहीतरी नवीन शिकायला हवे असे वाटते म्हणून तसा संकल्प केला जातो. संकल्प करणे म्हणजे भविष्याची स्वप्ने पाहणे. तरुण मन स्वप्ने पाहते,वय झाले कि स्वप्न कमी होतात, आठवणी वाढतात. माणसाचे मानसिक वय त्याचा जन्म होऊन किती वर्षे झाली यावरून ठरवता येत नाही.तो भूतकाळात अधिक रमतो कि भविष्याची स्वप्ने अधिक पाहतो यावरून ठरवावे लागते. संकल्प करणे हे मनाच्या तारुण्याचे लक्षण आहे. संकल्प थांबले म्हणजे वय झाले.त्यामुळे मनाने तरुण राहण्यासाठी संकल्प करीत राहूया,भविष्याचे नियोजन करूया,अपयशाची भीती न बाळगता नवी आव्हाने स्वीकारुया. संकल्प हे एक आव्हान असते,चॅलेंज असते.रोज सकाळी तोंड धुवायचे, किंवा आंघोळ करायची असा संकल्प करावा लागत नाही.कारण त्याची सवय झालेली असते.सवय होते म्हणजे आपल्या मेंदूत ते कोरले गेलेले असते,मेंदूतील पेशीत तसा मार्ग तयार झालेला असतो.कोणतीही कृती आपण नियमितपणे करू लागतो त्यावेळी मेंदूत नवीन मार्ग तयार होऊ लागतो.
एकदा तो मार्ग,न्युरोपाथवे तयार झाला कि ती गोष्ट,ती कृती सवयीची होते.एखादी चुकीची सवय बदलायची असेल म्हणजे सिगारेट सोडायची असेल तरी संकल्प करावा लागतो.सवयी बदलणे हे एक शास्त्र आहे,सायन्स आहे.त्यामध्ये संकल्पाला खूप महत्व आहे.नवीन वर्ष सुरु झाले कि आपण एक वर्षाचा संकल्प करतो पण तसे आवश्यक नाही,संकल्प कितीही काळाचा असू शकतो.आजचे मेंदूचे संशोधन असे सांगते कि संकल्प करणे आणि तो कृतीत आणणे हे माणसाच्या मेंदूतील प्री फ्रन्टल कोर्टक्सचे काम आहे.मेंदुतज्ञ या कार्याला सेल्फ रेग्युलेशन म्हणतात.आपल्या मेंदूतील या महत्वाच्या भागाला व्यायाम देण्यासाठी संकल्प करायला हवेत आणि ते पाळण्यासाठी मनाचे ब्रेक उपयोगात आणायला हवेत असे न्युरोसायन्स च्या आधुनिक संशोधनात दिसत आहे. तुम्ही ब्रेक नसलेल्या गाडीची कल्पना करू शकता का?चालती गाडी योग्य रस्त्यावर ठेवायची असेल तर तिला कोणत्या न कोणत्या प्रकारचे ब्रेक हवेतच.आजच्या काळातील अनेक प्रश्न आपला मनाचा ब्रेक न वापरल्याने होत आहेत.
खाण्यावर ब्रेक लागत नाही त्यामुळे वजन वाढते,मधुमेह होतो.भावनांवर ब्रेक लावता येत नाही त्यामुळे नाती बिघडतात,घटस्फोट होतात.झोपेवर ब्रेक लावता येत नाही त्यामुळे आळस वाढतो.सोशल मेडिया आणि टीव्हीवर ब्रेक लावता येत नाही त्यामुळे वेळ वाया जातो. खर म्हणजे मनाचा ब्रेक आपल्या मेंदूत इनबिल्ट आहे,आपल्या प्री फ्रन्टल कोर्टक्सचे ते काम आहे पण हे फंक्शन इनबिल्ट असले तरी ते अँक्टिवेट करावे लागते.आपल्या मोबाईलच्या हॅंडसेटमध्ये अनेक फंक्शन्स असतात पण अँक्टिवेट केल्याशिवाय ती उपयोगात आणता येत नाहीत.तसेच आपल्या मेंदूतील हा मनाचा ब्रेक अँक्टिवेट करण्यासाठी त्याला ट्रेनिंग द्यावे लागते.हे ट्रेनिंग म्हणजेच माइंडफुलनेस किंवा सजगता होय. या माइंडफुलनेसचा मेंदूवर आणि शरीरावर काय परिणाम होतो याचे जगभर संशोधन होत आहे.त्यात असे लक्षात येते आहे कि माइंडफुलनेस हा मेंदूचा व्यायाम आहे.एखाद्या माणसाने रोज डम्बेल्सने व्यायाम केला कि त्याच्या दंडाच्या बेटकुळ्या दिसू लागतात.
नियमित व्यायामाने दंडाचा स्नायू बळकट होतो.तसाच माइंडफुलनेसचा सराव केला तर आपल्या मेंदूतील अटेन्शन सेंटर अधिक सक्रीय होते,भावनांचे नियमन अधिक चांगले होते आणि वार्धक्यात होणारा स्मृतिभ्रंश टाळता येऊ शकतो असे विविध संशोधनात दिसत आहे. गम्मत म्हणजे शारीरिक व्यायामासाठी आपल्याला वेळ काढावा लागतो तेवढा वेळ मेंदूच्या या व्यायामाला लागत नाही.कारण आपण जे काही काम करतो आहोत तेच सजगतेने,जाणीवपूर्वक करणे,आपल्या मनाला वर्तमानात आणणे म्हणजेच माइंडफुल असणे होय.माइंडफुल म्हणजे सजग असणे हि कोणतीही कृती नसून मनाची स्थिती आहे.त्यामुळे फारसा वेळ न देताही हा मेंदूचा व्यायाम शक्य आहे फक्त त्याचे स्मरण होणेच आवश्यक आहे. तुम्ही इंटरनेटवर माइंडफुलनेस mindfulness असे सर्च केलेत तर तुम्हाला असंख्य व्हिडीओ पाहायला मिळतील,माहिती वाचायला मिळेल पण हि सर्व माहिती इंग्रजीत आहे.लोकमतमुळे हि सर्व माहिती तुम्हाला तुमच्या मातृभाषेत मिळणार आहे.माइंडफुल कसे राहायचे याचे संशोधन गौतम बुद्ध,पतंजली यांनी भारतात केले पण आपण ते विसरून गेलो आहोत. युरोप अमेरिकेत आज माइंडफुलनेस शाळाकॉलेजमध्ये शिकवले जाते,हजारो हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी माइंडफुलनेसबेस्ड स्ट्रेस रिडक्शन (MBSR) असे वर्ग घेतले जातात, माइंडफुलनेसवर आधारित मानसोपचार पद्धती तेथे विकसित झाली आहे.
गुगल सारख्या अनेक मोठमोठ्या कंपन्यात कर्मचाऱ्यांना माइंडफुलनेस शिकवले जाते.स्वतःची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अनेक सीईओनी माइंडफुलनेसला त्यांच्या दिनचर्येचा भाग बनवले आहे.ब्रिटनच्या एका खासदाराने माइंडफुल नेशन नावाचे पुस्तक लिहिले आहे टाईम,हफिन्गटन पोस्ट यासारख्या प्रतिष्ठित नियतकालिकात माइंडफुलनेसवर कव्हर स्टोरी लिहिल्या जातात.माइंडफुलनेस चा परिणाम मेंदूवर होतो हे आधुनिक संशोधनात सिद्ध होत असल्याने तेथे ते मुख्यधारेत आले आहे. हि माहिती मिळवायची,तिचा अनुभव घेऊन आपली सजगता वाढवायची आणि माइंडफुलनेसचा प्रसार करायचा असा संकल्प करुया
Back